मृत्युपत्र (इच्छापत्र) म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे आहे?
मृत्युपत्र (इच्छापत्र) का आवश्यक आहे? संपूर्ण माहिती आणि कायदेशीर प्रक्रिया
नमस्कार मित्रांनो, मृत्युपत्र का आवश्यक आहे? त्याची गरज काय? मृत्युपत्र कोण तयार करू शकतं? यावरच आजचा विशेष लेख खास तुमच्यासाठी.
**मृत्युपत्र** म्हणजे अनिश्चित भविष्यासाठी नियोजन करणं, आणि सर्वात महत्त्वाची अनिश्चितता म्हणजे मृत्यू आहे. म्हणूनच, तुमच्याकडे मालमत्ता असल्यास, तुमच्या निधनानंतर तुमची मालमत्ता कोणाला मिळावी, कोणाला मिळू नये, किंवा मालमत्ता ही समान प्रमाणात वारसांमध्ये वितरित व्हावी अशी तुमची जी इच्छा असते, अशा परिस्थितीत मृत्युपत्र बनवणं आवश्यक आहे. मृत्युपत्र ज्याला काही भागांमध्ये **इच्छापत्र** म्हणून देखील संबोधलं जातं.
सक्षम व्यक्तीने तयार करून ठेवलेल्या मृत्युपत्राचा दस्त हा कायदेशीररीत्या वारसांवर बंधनकारक दस्तावेज आहे. जो मृत्युपत्राचा दस्त तयार करून ठेवणारा हयात नसताना, त्याच्या मालमत्ता किंवा मालमत्तेबाबतची त्याची इच्छा अचूकपणे पूर्ण केली जाईल याची खात्री देतो. **भारतीय उत्तराधिकार कायदा १९२५** नुसार मृत्युपत्र तयार करता येतं. मृत्युपत्र हातानं किंवा टंकलिखित (Typewritten) केलं जाऊ शकतं.
---मृत्युपत्र कसे आणि कोणी तयार करावे?
**सदृढ मानसिक आरोग्य** असलेली आणि ज्या मिळकतीच्या बाबतीत मृत्युपत्र तयार करायचं आहे, त्यावर **निर्विवाद मालकी** असलेली कोणतीही व्यक्ती मृत्युपत्र तयार करू शकते. जबरदस्तीने किंवा खोट्या प्रभावाने प्राप्त केलेली मृत्युपत्र कायद्यानं वैध मानलं जात नाही. केवळ मृत्युपत्रकर्त्याच्या **स्वतंत्र इच्छेने** तयार केलेलं मृत्युपत्र हे कायद्याने वैध मानलं जातं.
एखाद्याच्या हयातीत तो कितीही वेळा मृत्युपत्र तयार करू शकतो, यावर कोणतंही बंधन नाही. परंतु, त्याने तयार केलेलं **सर्वात शेवटचं सक्षम मृत्युपत्र**च कायद्याने ग्राह्य धरलं जातं.
---मृत्युपत्र का बनवावे?
कोणत्याही वैयक्तिक मालकीच्या मालमत्ता धारकाने त्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या मिळकतीच्या विनावाद वितरणासाठी मृत्युपत्र तयार केलं पाहिजे. मृत्युपत्राचा उद्देश मालमत्तेच्या मालकाला त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या मिळकतीच्या वितरणावर **नियंत्रण** देणं हा आहे.
- मृत्युपत्रानं मालमत्तेचं हस्तांतरण सोपं होतं.
- मृत्युपत्रकर्त्याला अल्पवयीन मुले असल्यास, तो किंवा ती मृत्युपत्रात मुलांच्या संगोपनासाठी **संरक्षकाचं (Guardian) नाव** नमूद करू शकते.
- मालमत्ता मिळवण्यासाठी कुटुंबातील सदस्य किंवा मृत व्यक्तीच्या नातेवाईकांमधील संघर्ष सामान्य असतो. मृत्युपत्रानं असे संघर्ष टाळता येतात.
- मृत्युपत्र करणाऱ्या व्यक्तीला त्याची इच्छा असल्यास, त्याची मालमत्ता त्याच्या वारसांना न देता **धर्मदाय संस्थेला दान** देखील करता येते. यास वारसांना आक्षेप घेण्याचा अधिकार पोहोचत नाही.
मृत्युपत्र कसे लिहावे?
मृत्युपत्राचं कोणतंही विहित स्वरूप नसलं तरी, तुम्ही काही कायदेशीरदृष्ट्या आवश्यक घटक मृत्युपत्रात समाविष्ट केले पाहिजेत, जेणेकरून नंतर कुणीही त्यावर प्रश्न उपस्थित करू शकणार नाही. मृत्युपत्र तयार करतेवेळी तुम्ही खालील बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत:
- मृत्युपत्र तयार करून ठेवणारा **शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सदृढ** असणं आवश्यक आहे. भविष्यातील न्यायालयीन वाद टाळण्यासाठी, मृत्युपत्र तयार करतेवेळी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचं या संदर्भातील प्रमाणपत्र जोडणं उत्तम ठरतं.
- जर पहिले मृत्युपत्र तयार करून ठेवले असेल आणि त्यात बदल करीत असाल, तर सुरुवातीला नमूद करा की **पूर्वीचं मृत्युपत्र रद्द झालेलं आहे**.
- मृत्युपत्रामध्ये तुमची सर्व मालमत्ता (उदा. जंगम आणि स्थावर मालमत्ता, म्युच्युअल फंड, बचत खात्यातील पैसे, मुदत ठेवी इत्यादी) याची **स्पष्ट यादी** करा.
- तुमच्या मृत्यूपश्चात तुमची मालमत्ता **कोणाला मिळावी (लाभार्थी)** हे स्पष्टपणे नमूद करावं. शंका दूर करण्यासाठी तुमची मालमत्ता पारदर्शकपणे विभाजित करावी.
- जर तुम्ही एखाद्या अल्पवयीन व्यक्तीला काही मालमत्ता देत असाल, तर त्याचा **संरक्षक कोण असेल** याचा देखील उल्लेख केला पाहिजे. तुमचा विश्वास असलेली एखादी व्यक्ती निवडावी.
- वरील सर्व मुख्य आणि कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर, **दोन साक्षीदारांच्या** सोबत मृत्युपत्रावर स्वाक्षरी करावी. तुम्ही त्यांच्या उपस्थितीत मृत्युपत्रावर स्वाक्षरी केली आहे, हे प्रमाणित करण्यासाठी त्यांनाही साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करावी लागते.
- मृत्युपत्रावर सही करण्याची **तारीख आणि ठिकाण** त्यासोबतच तुमच्या साक्षीदारांचे **संपूर्ण पत्ते आणि नाव** सुद्धा लिहावे.
- तुमच्या साक्षीदारांना तुमच्या मृत्युपत्रातील मजकूर माहित असणं आवश्यक नाही, परंतु तुम्ही त्यांच्यासमोर सही केली आहे हे त्यांना माहीत असावे.
- मृत्युपत्राच्या प्रत्येक पृष्ठावर तुम्ही आणि तुमचे साक्षीदार स्वाक्षरी करत असल्याची खात्री करावी.
- मृत्युपत्रातील मजकूर दुरुस्त केल्यास, तुम्ही आणि तुमच्या साक्षीदारांनी त्यावर **प्रतिस्वाक्षरी (Countersign)** केली पाहिजे.
- मृत्युपत्र सुरक्षितपणे ठेवावं.
लक्षात घ्या की तुम्ही मृत्युपत्र कोणत्याही भाषेत लिहू शकता आणि त्यासाठी कायदेशीर भाषा वापरण्याची अजिबात गरज नाहीये, पण मृत्युपत्रातील भाषा **स्पष्ट** असली पाहिजे, जेणेकरून तुमच्या हेतूबद्दल शंका उपस्थित होणार नाही.
---मृत्युपत्राची नोंदणी आणि त्याचे फायदे
**भारतीय नोंदणी कायद्यातून मृत्युपत्रास मुद्रांक शुल्कातून आणि नोंदणीपासून सूट देण्यात आलेली आहे.** म्हणजेच मृत्युपत्रास नोंदणी करणं कायद्याने बंधनकारक नाहीये. परंतु, मृत्युपत्र तयार केल्यानंतर त्याची **नोंदणी करणं ही उत्तम बाब आहे**, कारण तुम्हाला याप्रकारे मृत्युपत्राची कायदेशीर प्रत मिळते. मृत्युपत्राशी छेडछाड झाल्यास, मूळ मृत्युपत्र आणि सादर केलेल्या मृत्यूची तुलना तयार केली जाऊ शकते. तसाच, मूळ पुरावा नष्ट झाल्यास प्रत घेण्यासाठी तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयात संपर्क साधू शकता. तसेच, दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करण्यात आलेल्या मृत्युपत्राला प्रश्नांकित होण्याची शक्यता कमी असते, कारण त्यावेळी दुय्यम निबंधक अधिकारी निष्पक्ष साक्षी देण्यास बांधिल असतो.
---मृत्युपत्र नसेल तर काय होतं?
वैध मृत्युपत्र न करता तुमचं निधन झाल्यास, तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये **वाद निर्माण होण्याची शक्यता अधिक असते.** अशा बाबतीत वारसा कायदे लागू होतात आणि मालमत्तेचे विभाजन प्रचलित वारसा कायद्यानुसार केले जाते. यामुळे तुमच्या इच्छेनुसार मालमत्तेचे वाटप न होण्याची शक्यता असते आणि कौटुंबिक संघर्ष वाढू शकतो.
---मृत्युपत्राचा परिणाम कधी सुरू होतो आणि त्याला आव्हान देता येते का?
मृत्युपत्र तयार करून ठेवणाऱ्याचे **निधन झाल्यावरच मृत्युपत्र वैध होतं आणि त्याचा अंमल सुरू होतो.** त्याच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही कालमर्यादा नसते. जर एखाद्याला इच्छापत्राला आव्हानित करायचंच असेल, तर त्यांनी ते **तीन वर्षांच्या आत** करणं आवश्यक आहे. अल्पवयीन व्यक्तीने तयार केलेलं मृत्युपत्र, मानसिक दृष्ट्या अक्षम असलेल्या व्यक्तीने किंवा त्याच्या संवेदनांमध्ये नसलेल्या व्यक्तीने, किंवा बळजबरीने केलेलं मृत्युपत्र कायद्याने वैध किंवा बंधनकारक मानलं जाऊ शकत नाही.
---निष्कर्ष
आतापर्यंत तुम्हाला कायदेशीररीत्या वैध मृत्युपत्र बनवण्याचं महत्त्व कळलं असेल, जेणेकरून तुमच्या प्रियजनांना तुमच्या निधनानंतर तुमची मालमत्ता कशी विभागली जावी हे निश्चित होईल. मृत्युपत्र तयार करून ठेवण्याची इच्छा असलेल्या व्यक्ती वकिलाचा सहभाग न घेता देखील मृत्युपत्र तयार करू शकतो, परंतु कायदेशीर आणि वैध तसेच न्यायालयात कायद्याच्या कसोटीवर खरं उतरणारं मृत्युपत्र तयार करण्यासाठी **वकिलाची मदत घेणं उत्तम असतं**.
मृत्युपत्राच्या दस्तास मुद्रांक शुल्कातून आणि नोंदणी करापासून सूट देण्यात आलेली आहे, म्हणजेच तुम्ही मृत्युपत्र साध्या कागदावर देखील तयार करू शकता. परंतु, असं मृत्युपत्र न्यायालयात सिद्ध करणं जिक्रीचं जातं. म्हणून, मृत्युपत्र नोंदणी केलेलं उत्तम, कारण मृत्युपत्राला न्यायालयात आव्हान देता येऊ शकतं आणि त्याच्या कायदेशीर वैद्यतेबद्दल किंवा पवित्रतेबद्दल शंका व्यक्त होऊ शकते. त्यामुळे **अननोंदणीकृत मृत्युपत्रापेक्षा नोंदणीकृत मृत्युपत्र अधिक मजबूत आहे**, कारण यामुळे त्याची वैधता वाढते आणि ती रद्द होण्याची शक्यता ही कमी होते.
अशाप्रकारे, मृत्युपत्र का गरजेचं आहे, त्याचा उपयोग कुठे होतो, त्याची नोंदणी कशी केली जाते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता मिळाली असतील. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी **शेअर नक्की करा!**
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
१. मृत्युपत्र (इच्छापत्र) म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे आहे?
मृत्युपत्र हे एक कायदेशीर दस्तऐवज आहे जे एखाद्या व्यक्तीने त्याच्या मृत्यूनंतर त्याची मालमत्ता कोणाला मिळावी किंवा तिचे वितरण कसे व्हावे याबद्दलची आपली इच्छा नमूद करण्यासाठी तयार केले जाते. हे भविष्य नियोजन करण्याचा एक मार्ग आहे, विशेषतः अनिश्चित भविष्यासाठी. जर तुमच्याकडे मालमत्ता असेल, तर मृत्युपत्र बनवणे आवश्यक आहे कारण ते तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या मालमत्तेचे वितरण तुमच्या इच्छेनुसार होईल याची खात्री देते आणि वारसांमधील संभाव्य वाद टाळण्यास मदत करते.
२. मृत्युपत्र कोण तयार करू शकते?
सदृढ मानसिक आरोग्य असलेली आणि ज्या मालमत्तेवर त्याची निर्विवाद मालकी आहे अशी कोणतीही व्यक्ती मृत्युपत्र तयार करू शकते. सक्तीने किंवा खोट्या प्रभावाने बनवलेले मृत्युपत्र कायद्याने वैध मानले जात नाही. केवळ मृत्युपत्रकर्त्याच्या स्वतंत्र इच्छेने तयार केलेले मृत्युपत्रच कायदेशीररित्या वैध असते. अल्पवयीन किंवा मानसिकदृष्ट्या अक्षम व्यक्तीने तयार केलेले मृत्युपत्र वैध मानले जात नाही.
३. मृत्युपत्र कसे तयार करावे?
मृत्युपत्रासाठी कोणतेही विशिष्ट स्वरूप नसले तरी, त्यात काही कायदेशीरदृष्ट्या आवश्यक घटक समाविष्ट करणे महत्त्वाचे आहे: मृत्युपत्रकर्त्याची संपूर्ण माहिती (नाव, वय, पत्ता, जन्मतारीख). मृत्युपत्र सदृढ मानसिक आणि शारीरिक स्थितीत तयार केले जात आहे याचा स्पष्ट उल्लेख. (शक्य असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडणे उत्तम). पूर्वीचे मृत्युपत्र रद्द केले असल्यास त्याचा उल्लेख. सर्व मालमत्तेची स्पष्ट यादी (जंगम आणि स्थावर). मालमत्ता कोणाला मिळावी (लाभार्थी) आणि त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती. अल्पवयीन लाभार्थ्यासाठी संरक्षकाचा उल्लेख. दोन साक्षीदारांसमक्ष मृत्युपत्रावर स्वाक्षरी. साक्षीदारांची नावे आणि पत्ते नमूद करणे. मृत्युपत्राच्या प्रत्येक पानावर स्वतःची आणि साक्षीदारांची स्वाक्षरी. भाषा स्पष्ट असावी आणि हेतू स्पष्ट असावा.
४. एका व्यक्तीला किती वेळा मृत्युपत्र तयार करता येते?
एखाद्या व्यक्तीच्या हयातीत तो कितीही वेळा मृत्युपत्र तयार करू शकतो. यावर कोणतेही बंधन नाही. मात्र, त्याने सक्षम स्थितीत तयार केलेले सर्वात शेवटचे मृत्युपत्रच कायद्याने ग्राह्य धरले जाते.
५. मृत्युपत्राची नोंदणी करणे बंधनकारक आहे का?
नाही, भारतीय नोंदणी कायद्यानुसार मृत्युपत्रास मुद्रांक शुल्कातून आणि नोंदणीपासून सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे मृत्युपत्राची नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक नाही. तथापि, मृत्युपत्र तयार केल्यानंतर त्याची नोंदणी करणे अत्यंत फायदेशीर आहे. नोंदणीकृत मृत्युपत्र कायदेशीरदृष्ट्या अधिक मजबूत असते, त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता कमी असते आणि मूळ प्रत हरवल्यास दुय्यम निबंधक कार्यालयातून प्रत मिळवता येते.
६. मृत्युपत्र नसेल तर काय होते?
जर एखाद्या व्यक्तीचे वैध मृत्युपत्र न करता निधन झाले, तर त्याच्या मालमत्तेचे विभाजन प्रचलित वारसा कायद्यानुसार केले जाते. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मालमत्तेच्या वितरणावरून वाद आणि संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वाढते.
७. मृत्युपत्राचा परिणाम कधी सुरू होतो?
मृत्युपत्र तयार करून ठेवणाऱ्या व्यक्तीचे निधन झाल्यावरच मृत्युपत्र वैध होते आणि त्याचा अंमल सुरू होतो. त्याच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही कालमर्यादा नसते.
८. मृत्युपत्राला आव्हान देता येते का?
होय, मृत्युपत्राला न्यायालयात आव्हान देता येऊ शकते. मृत्युपत्राच्या कायदेशीर वैधतेबद्दल किंवा सत्यतेबद्दल शंका असल्यास त्यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. मृत्युपत्राला आव्हान देण्यासाठी तीन वर्षांच्या आत न्यायालयात अर्ज करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत मृत्युपत्राला आव्हान देणे अधिक कठीण असते कारण त्याची वैधता अधिक मजबूत मानली जाते.